महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

CM Warkari Mahamandal : महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन ! शासन निर्णय प्रसिद्ध

पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ – CM Warkari Mahamandal” स्थापन करण्याचा  मोठा निर्णय शासनाने घेतला असून त्या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय आज प्रसिद्ध  करण्यात आला आहे. मुख्यमंत्री वारकरी (CM Warkari Mahamandal) महामंडळाचे मुख्यालय ते पंढरपूर  येथे असणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्याचबरोबर सामाजिक समतेचा संदेश देणारे राजर्षि छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी. एका बाजूस ७२० किलोमीटर लांबीचा अथांग असा कोकण समुद्रकिनारा तर दुसरीकडे भव्य असा विशाल सह्याद्री पर्वत. निसर्गाने आपल्या मुक्त हस्ताने महाराष्ट्रात वैविध्यतेची उधळण करून महाराष्ट्राला अधिक समृद्ध बनविले आहे. अशा या महाराष्ट्रामध्ये सामाजिक समतेची, बंधूभावाची मोठी परंपरा आहे, इतिहास आहे.

विविध जातीपातीचे लोक या ठिकाणी हजारो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. अशा या समृद्ध महाराष्ट्रातील अठरा पगड जातीला एकत्रित ठेवण्याचे काम ज्यांनी केले त्यात महाराष्ट्रातील थोर समाजसेवक विभूती आणि संत महंत यांचा फार मोठा हातभार आहे. अगदी याचे उदाहरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली पंढरपूरच्या विठोबारायाची वारी. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य व समाजकार्य भक्तीमार्गाने करीत असतात.

“वारी” म्हणजे पवित्र स्थळाची नियतकालिक यात्रा आणि “वारकरी” म्हणजे नियतकालीक वारी करणारा. वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय असून त्याने अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे श्रेय संत ज्ञानेश्वरांना दिले जाते.

याद्वारे संत बहिणाबाई यांनी भागवत धर्माचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मुक्ताई हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वारी, ज्या मध्ये अनेक जाती धर्माचे भावीक लाखोच्या संख्येने सहभागी होतात. वारी करण्याची परंपरा ही साधारणतः ८०० वर्षांहून अधिक कालावधीपासून असल्याचे मानले जाते. अशा या वारकऱ्यांकरिता मा. मुख्यमंत्री, महोदयांनी वारकरी संप्रदायाकरिता स्वतंत्र महामंडळ” स्थापन करण्याबाबतची घोषणा केली आहे.

“आषाढी वारी” म्हणजे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूर पर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय. वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच, परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. “वारी” ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अशा दोन वेळा होते. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या ठिकाणा वरुन मार्गस्थ होत असतात.

संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ (पैठण), संत सोपानकाका (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव (पंढरपूर), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत जनार्दनस्वामी (छत्रपती संभाजीनगर), संत जयरामस्वामी (वडगाव), संत शेकूबोवा (शिरसावडी), संत घाडगेबोवा (कोळे), संत तपकिरीबोवा (चिंचगाव), संत मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), संत रोहिदास (पंढरपूर), संत संताबाई (पंढरपूर), संत चोखोबा (पंढरपूर), संत चोखोबा बंका (मेहुणपुरा), संत दामाजी (मंगळवेढे), संत रुकमाबाई (कौंडण्यपूर- अमरावती), संत शंकर महाराज (माहुली-अमरावती), संत गोरखनाथ (शिराळा), या दिंडींबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात.

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ – CM Warkari Mahamandal :

वारकरी जो धर्म पाळतात त्या धर्मालाच “भागवत धर्म” म्हटले जाते. वारीतून संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते व त्याचा प्रभाव जनमानसावर पडलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील गावागावांतून लाखो भाविक दरवर्षी वारीला जातात. वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. परंतु काळानुरूप वारकरी आणि दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्वाचे ठरले आहे, याकरिता वारकरी महामंडळ (CM Warkari Mahamandal) उपयुक्त ठरू शकेल. याबाबतचा विचार करुन मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक ११ जुलै, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ (CM Warkari Mahamandal)” स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मा. मंत्रिमंडळाच्या या निर्णयास अनुसरून शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ (CM Warkari Mahamandal)” स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या महामंडळामार्फत पुढील योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे :-

मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची रचना:-
  • मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.
  • महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची “व्यवस्थापकीय संचालक” म्हणून नियुक्ती करण्यात येईल.
  • मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल रू.५० कोटी इतके असेल.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे कार्य :-

शेकडो वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून “वारी” करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे. सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास, किर्तनकार व वारकऱ्यांना अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इ. सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ (CM Warkari Mahamandal) स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री वारकरी (CM Warkari Mahamandal) महामंडळामार्फत वारकरी, किर्तनकार, तीर्थक्षेत्रांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत कार्य करण्यात येईल.

मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या विविध योजनाः-
  • महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे.
  • सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गाची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करुन नियोजन करण्यात येईल.
  • आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
  • वारकरी भजनी मंडळाला भजन व किर्तन साहित्याकरिता (टाळ, मृदंग, विणा, इ.) अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  • किर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबविण्यात येईल.
  • आषाढी व कार्तिकी वारीसाठी दिंड्याना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
  • पंढरपुर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी,
  • संत सावतामाळी समाज मंदीर, अरण ता. माढा जि. सोलापूर व इतरही तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल.
  • चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
  • परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृध्दापकाळामध्ये “वारकरी पेंशन” योजना सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
  • संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे पूज्य सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही. या व अशा इतर संस्थांना किर्तनभवन, शिक्षण वर्ग, भजन हॉल या विकासकामांकरिता भरीव निधी देण्याबाबतची कार्यवाही मुख्यमंत्री वारकरी (CM Warkari Mahamandal) महामंडळाकडून करण्यात येईल.
  • संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर, ता.जि. उस्मानाबाद (धाराशिव) येथे १५ हजार स्केअर फुटाचा सभामंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
  • श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर पालखी मार्ग व समाधी स्थळ याकरिता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
  • श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  • श्री क्षेत्र पंढरपूर येथे म्हसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पादचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  • श्री क्षेत्र पंढरपूर येथील ६५ एकरमध्ये काँक्रीटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे, त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत. या जागेव्यतिरिक्त पालख्या / वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणा-या सर्व मार्गावर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी, फडांसाठी तसेच त्यांच्या सोयीसुविधांसाठी भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
  • सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करुन प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था करण्याकरिता कायमस्वरुपी निधी मंजूर करण्यात येईल.
  • आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकरी/भाविक तसेच दिंडींच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
  • महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, प्रसाधन गृहे, वत्रांतर व इतर अनुषंगिक सोयी सुविधा पुरविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

महामंडळाकरीता आवश्यक पदे (आकृतीबंध) व आर्थिक तरतूद, स्वतंत्र लेखाशिर्ष याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल. सद्यः स्थितीत महामंडळ कार्यान्वित करण्याचा खर्च विभागाच्या ज्येष्ठ नागरिक योजनांच्या लेखाशिर्षामधून करण्यात येईल. मुख्यमंत्री वारकरी (CM Warkari Mahamandal) महामंडळाची कार्य नियमावली आणि तद्अनुषंगिक इतर आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय – CM Warkari Mahamandal GR PDF:

महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरीता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ (CM Warkari Mahamandal) स्थापन करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CM Teerth Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना; ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.